शब्द झाले फितूर

शब्दातून तुझ्या मी
काढू कसा तो अर्थ ।
वाटले विषारी बाण
नाही मज तो स्वार्थ ।

शब्दात दिसे भावना
भावनेत असे मन ।
शब्द झालेत फितूर
निराकार झाले तन ।

नको आता उजळनि
उजाडली परतीची वाट ।
जायचे विसरून आता
झाली मोकळी गाठ ।
Sanjay R.

शब्दांची उकल

तुझ्या शब्दांची
होत नाही उकल ।
शोधतो अर्थ सारे
घेतो शब्दांची दखल ।

सांगून जातात कधी
शब्द शब्दांचाच अर्थ ।
कळते मग मलाही
प्रयास सारेच ते व्यर्थ ।

सांगू कुणास मी कसे
मनात आहे ऐक आशा ।
शब्द हवा मज एक
नको त्यातून निराशा ।
Sanjay R.

नको दाखवू अभिमान

नको दाखवू अभिमान
खोटी तुझी रे शान ।
फुकाचा रे हा मान
कळे साऱ्यासी छान ।

बघ होऊन तू लहान
होशील किती महान ।
न मागता मिळेल
तुज सारा मानपान ।

मिरवतील जन सारे
हरपेल तुझे भान ।
मोठा होऊनही वाटेल
सुंदर तुझेच ध्यान ।
Sanjay R.

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
जन जनास ती जोडी ।

वऱ्हाडीची तिला साथ
सोबतीला पुणेरी हात ।

खानदेशी आहे बाज
मुंबा नगरीचा तिला साज ।

थोरा मोठ्यांनी सजविले
या महाराष्ट्रात रुजविले ।

माय मराठी मी म्हणतो
गाणे तिचेच गुणगुणतो ।

गातो मराठीची मी थोरवी
फुलते मनामनात पालवी ।
Sanjay R.

नको जाऊ तू सोडून

नको जाऊ तू सोडून
भरला हा संसार ।
तुझ्या विना संग मज
आहे कुणाचा रे आधार ।

जगणे मरणे नाही हाती
पण कशास तो विचार ।
मन होते असे अधर
आणि अंतरात रे प्रहार ।

साथ जीवनाची आहे
उचल थोडा तू भार ।
झेलील मीही तुझ्यासवे
होतील जेही वार ।
Sanjay R.

साथीदार

जीवनाची तूच साथी दार
वाटतो किती आधार ।
जातो विसरून तुझ्यासवे
नसतो कशाचाच भार ।

कधी मनात उठते वादळ
सारखे डोकावतात विचार ।
होते नजरही शून्य
लागते डोळ्यांनाही धार ।

सुन्न पडते डोके आणि
अंतरात होतात प्रहार ।
होताच आठवण मग तुझी
मनात फुलते बहार ।
Sanjay R.

अंगणात असावी तुळस

तुझ्यासाठी
केला मी नवस ।
मग प्रेमासाठी
फक्त ऐक दिवस ।
नको नको
सोड आता आळस ।
रोज बघतो
मंदिराचा कळस ।
गंध नसेल त्याला पण
लाल झालाय पळस ।
तरीही वाटतं
अंगणात असावी तुळस ।
Sanjay R.

बायकोले पत्र

माही लाडाची लाडकी नमु…….

पत्र लिव्हाच कारन अस हाये का,अज धा दिस झाले तुले माहेरी जाऊन.

पन तू गेली त्या रोजपासून महा तू त फोनच उचलत न्हाई. आता त मले वाटाले लागल का तू मले इसरली का का त कोन जाने.

इसरलि अशिन त मले काई प्रॉब्लेम न्हाई, पन मंग तूले तकलीफ झाली का माह्या आंगावर तुले काई वसकावता येनार न्हाई. तशी मले आता साऱ्यचीच सवय झाली हाय…..

बर थे जाऊ दे……
त मी का म्हणत होतो. मी तुले धां दिसापासून फोन करून रायलो, पर तू काऊन उचलत न्हाई. मले काई समजाले यिऊन न्हाई रायल, मले वाटते, तुह मन तिकडचं रमल का काय. तसं मले माईत हाय का माह्या शिवाय तुह बोलन कोनीच आयाकुन घेणार न्हाई. मीच व्हय मुन सारं सहन करतो. तुय तिकड सगळ्यायशी बरोबर जमत हाय ना. कोनाशी भांडू गिंडू नोको. न्हाई त अजून आफत व्हाची.सासू बाई आन तुह्या भावजैशी बाराबर जमवून घेत जा.

बर हे बी जाऊ दे……

तू फोन काऊन उचलत न्हाई.तिकड रेंज चा प्रॉब्लेम हाय का. का तूहा फोन अजून तुया पर्स मंदून तून काढलाच न्हाई. तशी तू लय इसर भोयी हाय. कुठी इकड तिकड टाकून दिला असल, न आता दिसत नसन. त पायजो बावा फोन लय माहागाचा हाय. लोन काढून म्या तुले घिऊन देला. त्या फोन साठी तू कशी येक महिना रुसून बसली होती . आता हारवला त दुसरा काही भेटणार न्हाई. पयलेच मी सांगून ठीवतो. मग मनाच न्हाई का सांगितलं न्हाई.

बरं थे जाऊ दे…….

मी का म्हणत होतो. मी इथ बराच हाय. जेवनाची बी काई चिंता न्हाई. थे आपल्या बाजूची शाम्याची बायको हाय ना सुंदरी , थे रोज सकाय संध्याकाय माह्यासाठी डब्बा घिउन येते. मस्त स्वैपाक करते ओ थे. मोठ्या खुशिन भावजी भावजी करत आणून देते. मले बी आरामच झाला. मस्त जेवाले  भेटते गरम गरम. रोज काही ना काही नवीन करून आनते डब्यात. तू काही कायजी करू नको. सकाय आन दुपारचा चाहा कराले बी थेच येते.मले बी करून देते न थे बी संगच पेते. मले आता कायचच टेन्शन न्हाई.

तू अजून धा इस दिवस बी न्हाई आली तरी चालते. फक्त याच्या आंदी तू कधी आन कितीक वाजता पोहोचशिन थे मले पयले सांगजो. न्हाई त माही आफत व्हाची. पर तू काई टेन्शन नको घिवू.

मी ईकड मजेतच हाय. लय बर मोकय मोकय वाटते. माहा डोकं बी लय शांत रायते.

मले वाटते. तू बी तिकड मस्त खुश असाशिन. अशीच खुश राय. आपल्या तान्या बाई कड लक्ष देत जा. तीच खान पेन बराबर करत जा. मले तिची लय आठोन येते. पर तू तिची माय सोबत अस्तानी मले काई टेन्शन न्हाई.

याच्या वक्ती आठोनिन फोन करजो म्हणजे मले काई टेन्शन रायनार न्हाई.

चाल मंग थे सुंदरी याची येळ झाली. चां कराले येईन इतक्यात.

बर हाय. कायजी करू नको.

तुया तान्या बाईचा पप्पा.
Sanjay R.

महागाई

माझी महागाई वरील कविता माझे व्यासपीठ या फेब्रुवारी च्या मासिक अंकात प्रकाशित झाली. संपादकांचे धन्यवाद.