करू नकोस तू वाद
देईल तुला मी साद ।
तुला आवडेल सारे
देशील मग तू दाद ।
शब्द नि शब्द मग
ठेवशील तूच याद ।
विसर तू मनातले
दे सोडून हा नाद ।
जुनाच आहे हाही
भांडणाचा प्रवाद ।
करू नकोस तू वाद
येईल तुलाच याद ।
Sanjay R.

करू नकोस तू वाद
देईल तुला मी साद ।
तुला आवडेल सारे
देशील मग तू दाद ।
शब्द नि शब्द मग
ठेवशील तूच याद ।
विसर तू मनातले
दे सोडून हा नाद ।
जुनाच आहे हाही
भांडणाचा प्रवाद ।
करू नकोस तू वाद
येईल तुलाच याद ।
Sanjay R.
वळून नको बघूस
पुढेच जायचे आहे ।
येईल तुला कळून
पुढ्यात दगड आहे ।
पाऊल पुढे ठेवता
खळगा समोर आहे ।
जाईल तोल सांभाळ
आधार कसला आहे ।
जीवन हाच खळगा
जायचे तरून आहे ।
कठीण प्रवास सारा
सदा हसायचे आहे ।
कुणास अंत चुकला
सत्यही इथेच आहे ।
माघार नकोच आता
जायचे अजून आहे ।
विचार कशाचा नको
दुःखात आनंद आहे ।
सुखाचा मार्ग वेगळा
हसणे हा छंद आहे ।
Sanjay R.
वाटा जरी ओळखीच्या
येते कधीही वादळ
वाऱ्यासोबत होते मग
माणसांची पळापळ ।
उडवून नेतो सारेच
माजते नुसती खळबळ ।
होतो वारा शांत आणि
उरते फक्त हळहळ ।
Sanjay R.
अष्टाक्षरी
” ओला सुगंध मातीचा “
गेले आभाळ झाकुनी
भासे प्रहर रातीचा ।
वाहे वादळी वारा तो
जसा निधड्या छातीचा ।
कुठे पडली वीज ती
झाला प्रकाश वातीचा ।
सरी सूटल्या नभात
भिजे देह धरतीचा ।
धरा झाली ओली चिंब
पडे पाऊस प्रीतीचा ।
नाही फुलला मोगरा
ओला सुगंध मातीचा ।
बळी राजा सुखावला
आहे तोच हिमतीचा ।
साथ नको सोडू आता
भार झेलतो शेतीचा ।
स्वप्न बघतो डोळ्यात
शेतकरी तो जातीचा ।
सज्ज तो जाहला द्याया
नारा हरित क्रांतीचा ।
Sanjay R.
वेळच पडतो अपुरा
कुठे उरेल क्षण ।
ढीग हवा साऱ्यांना
पुरेल कसा कण ।
मुंगीचे असते बरे
वेचते एकेक कण ।
तरीही कसा तो
भरतो किती मण ।
आमची हावच भारी
नको कण कण ।
नितीच उरली कुठे
पडतो मग घण ।
काही तर असे इथे
पछाडतील सारे रण ।
मिळत नाही काहीच
उपाशी होतो सण ।
विचारांचा सारा घोळ
मी सांगिल तू म्हण ।
माणुसकीच नाही
विचारू नका गण ।
Sanjay R.
वर्णू किती मी माझ्या देशा
ओला गधं या मातीचा…..
झेललेत वार किती तू
गर्व मज निधड्या छातीचा…
किती किती मी नावे घेऊ
देश अमुचा गांधींचा …….
थोर इथले संत महात्मे
संदेश दिला तो शांतीचा….
राम असो वा कृष्ण असो
गर्व आम्हा मानव जातीचा…
जगतो मरतो कष्ट करुनी
सम्मान आम्हा बळी राजाचा…
विश्वास नाही अजून सरला
करतो आदर जीवनाचा….
नमन करतो या भूमातेला
जयजयकार या देशाचा….
Sanjay R.
शब्दातली जादू तुझ्या
तार मनातले छेडते ।
शोधतो तयात मी
का प्रित अशीच जडते ।
भावनांचा मेळ हाच
मन मनास जोडते ।
प्रीतिच्या या वाटेवरती
काय असे ते घडते ।
दुखातही आपोआप
अश्रू नायनातून ढळते ।
Sanjay R.
वाट मी पाहतो
कधी येशील तू ।
वाटेवर डोळे आता
वळून बघशील तू ।
मनात ओढ तुझी
आतुर झाली नजर ।
मागोवा घेती कान
श्वासांचीही थरथर ।
आहे उभा मी वाटेत
थकले पायही आता ।
गती हृदयाची वाढली
आठवे मनातली गाथा ।
फुलले मन माझे
दुरूनच तुला बघून ।
हरपलो तुझ्यात मी असा
गेली त्यातच तू निघून ।
Sanjay R.
नको वाटते ही शांतता
गोंगाटच हवा ऐकायला ।
सवय झाली माणसांची
हवे ना कोणी बोलायला ।
होते कधी चीड चीड
हात ही उठतात मारायला ।
शांतता मात्र नको वाटते
शॉटच हवा थोडा डोक्याला ।
पहाटे चाले किलबिल पक्षांची
दिवसभर ऐकायचे गोंधळाला ।
रात्री असते निरव शांतता
नसतो कुणीच जागायला ।
रातकिडे मग देतात हाक
भूतच निघतात नाचायला ।
म्हणून वाटते नको ही शांतता
सोबत हवेच कोणी हसायला ।
Sanjay R.
कसा खेळ हा लपाछपीचा
होते चुकामुक दोष कुणाचा ।
विलंब होतो थोड्या क्षणाचा
छळ होतो निर्दोश मनाचा ।
हवा घडीभर वेळ सुखाचा ।
नको लवलेश त्यात दुःखाचा ।
जीवनात ऊन पाऊस कधी वारा
आसरा मज आहे सावलीचा ।
Sanjay R.
भावनांचाच खेळ सारा
विचारांचा झुलतो वारा ।
काय येईल मनात केव्हा
मधेच चमकून जातो तारा ।
सहजच मग आठवण येते
धुंद होतो प्रकाश सारा ।
आठवणीच कधी देती दुःख
वाहे डोळ्यातून टपटप धारा ।
Sanjay R.
अस्त्र नको, शस्त्र नको
कशी ही लढाई ।
पैशाच्या बळावर
मारायची नुसती बढाई ।
निर्बल बघून सारे
करतात मग चढाई ।
निरपराधी जातात बळी
म्हणे कोण कुणाचा भाई ।
नाव किती गाव किती
वाळत नाही शाई ।
खबरे मागून खबर येते
जातो जीव त्राही ।
विचारांना थारा कुठे
सारे उचलतात बाही ।
रक्त गळते डोळ्यावाटे
पुसायला कोणी नाही ।
मनातच उठतात ज्वाला
होते लाही लाही ।
दूर निपचित पडले प्रेत
बघते दिशा दाही ।
हरलो जिंकलो वाद कुठला
मी जगतो शाही ।
सांगू नका वरचढ कोण
कोण कुणाला पाही ।
Sanjay R.
तुझ्या माझ्या नात्यात
एक अनोखा बंध ।
दरवळतो जीवनात
प्रीतीचा सुगंध ।
क्षण नि क्षण फुलतो
दरवळतो सुगंध ।
दुःख होते दूर आणि
मिळतो आनंद ।
हसवायचे तुला कसे
चाले त्याचा प्रबंध ।
बघायचे हास्य तुझे
लागला मज छंद ।
अंतरात बघ माझ्या
असतो तुझ्यात धुंद ।
जन्मोजन्मी असू दे
असाच ऋणानुबंध ।
Sanjay R.
कसे हे ऋण फेडावे
आयुष्य परत जोडावे ।
पडला विसर तो कसा
का आपल्यात हे घडावे ।
तू सागर प्रेमाचा अथांग
वाटे मज त्यात डुबावे ।
होऊन तुझाच भक्त परत
अंतरात तुझ्या मग शिरावे ।
तुजविण कोण मोठा इथे
वाटे भक्तीत तुझ्या जगावे ।
नाम तुझेच घेता घेता
डोळे शेवटचे मग मिटावे ।
कर्ताही तू करविताही तू
तुजविण मी कसे जगावे ।
Sanjay R.
कळलेच नाही मला
काय हवे होते तुला
मागे पुढे फिरायचो
होऊन एक झुला ।
मर्जी होती ना तुझी
जपावे मीच तुला ।
अजूनही जपतो आहे
समजून घेना मला ।
नाते आहे हे प्रेमाचे
मनाने मीही खुला ।
मन तुझेही कोमळ
तूच माझ्या फुला ।
Sanjay R.
किती करायचे सहन
आहे ना प्रश्न गहन ।
रोज होतात वाद
पण परत देतात साद ।
मन होतं म्हणे मोकळं
सांगायचं कसं सगळं ।
मार्ग आता एकच
प्रश्नांची उत्तरं फेकच ।
नको प्रश्न नको उत्तर
मनही झाले पत्थर ।
चढू दे दिवस एकेक जरा
कालच्या पेक्षा होता बरा ।
भोगली आजवर हीच तऱ्हा
जीवनाचा तर हाच फेरा ।
येईल कधी जोरात वारा
नेईल उडवून पसारा सारा ।
Sanjay R.
बाबा म्हटलं की
आठवतो त्यांचा मार ।
शब्द होतात शांत
आणि शरीर होते गार ।
जीवनात बाबा म्हणजे
आयुष्याचा तेच सार ।
असतो पाठीवर हात
मग कुठे कशाची हार ।
बोलणे कडक किती
शब्दांना त्यांच्या धार ।
सोबत असता त्यांची
काहीच वाटेना भार ।
झेलतील स्वतः सारे
प्रपंचातले ही प्रहार ।
करतो अनुकरण मी
जे होते त्यांचे विचार ।
बापाचाच असतो बघा
पगडा लेकरावर फार ।
हिरो असे त्याचे बाबा
नसे कशाची तक्रार ।
नाते बाप नि लेकाचे
वाटे बाकी सारे बेकार ।
लेकराची स्वप्न सारी
करतो बापच साकार ।
म्हातारपणी साथ लागे
देऊ नका तूम्ही नकार ।
Sanjay R.
येईल मी स्वप्नात तुझ्या
घेशील ना जवळ तुझ्या ।
सांगिल मी कानात तुझ्या
ऐकशील ना मनातलं माझ्या ।
तुही सांगशील मनाचं तुझ्या
वाटेल बरं मनास माझ्या ।
रंगतील गप्पा तुझ्या माझ्या
सरेल ही रात्र कुशीत तुझ्या ।
येईल मी ग स्वप्नात तुझ्या
येशील ना तुही स्वप्नात माझ्या ।
Sanjay R.
” वडील एक आधार “
वडील तर कुटुंबाचा आधार
उचलतात तेच सारा भार ।
हवे नको ते सारे बघतील
मनात नेहमी घरचा विचार ।
सुख असो वा दुःख कुणाचे
मुकपणाने झेलतील वार ।
प्रसंग येता कठीण कधी तो
होतील मग ते कठोर फार ।
रक्ताचेही ते पाणी करतील
मानणार नाही कधीच हार ।
खंबीर मन नी कडक आचार
प्रेमही त्यांचे असते अपार ।
घरात वडिलांची किंमत फार
नका करू हो त्यांना लाचार ।
Sanjay R.