सुंदर की अति सुंदर , काय म्हणू मी तिला. सौंदर्याची मलिकाच ती , सौंदर्यवती म्हणू तिला. रंग तिचा गोरा पान , डोळे जशे हरिणीचे, नाक सरळ गाल थोडे गोबरे, ओठ मधूघट जसे. बोलणेही अत्यंत लघवी वाटायचं बस बोलतच राहावं, कुणाही नवख्याला वाटावं बस बघतच राहावं. पोशाख तिचा असला जरी साधा, शोभतो तिलाच तो तिच्यासाठीच असावा.
सूर्याच्या प्रथम किरणा आधीच ती उठायची. सूर्य डोक्यावर येईस्तो काम सारेच ती सम्पवायची. दुपार तिची असायची आरामाची सायंकाळ मात्र फिरायची. फिरायला निघाली ती की, येणारे जाणारे लोक तिला न्याहाळायचे. सौंदर्य तिचे डोळे भरून बघायचे. सहजच शब्द दोन निघायचे, वाह अति सुंदर सारेच मनात म्हणायचे.
अस्त व्हायचा सूर्याचा त्या आधीच ती परतायची. घरात ती आहे की नाही कधीच कुणास ती नाही कळायची. मात्र सुर्योदयानंतरच ती परत दिसायची. झाशीची राणी कधी भासायची. कधी स्वतःतच वावरणारी साधी सरळ जशी सवित्रीच वाटायची. आज मात्र ती वाटत होती वेगळी. सुर्योदया आधीच तिची कामं आटोपली होती सगळी. काय विशेष असावं काहीच कळेना. चेहऱ्यावरचे भाव तिच्या कशाशीस जुळेना. बघत होती सारखी दूर त्या वाटेवर. घेत होती अंदाज दिसतंय कोण रस्त्यावर. सारखे तिचे सुरू होते आत बाहेर जाणे. वाटेकडे बघून यायचे लक्षात हिरमुसणे.
आता मात्र तिची उत्कंठा होती वाढली . वाटेवरची नजर तिने नाही आता काढली. तेवढ्यातच एक आटो येऊन थांबला तिच्या दारात. मर्द मराठा सैनिक उतरला तिथे तोऱ्यात. ओवाळणीचे ताट घेऊन आली ती अंगणात . मर्दाला ओवाळताना हसत होती गालात .
पतीचं होता तिचा भारतीय सैन्यात. लग्न करून गेलेला पहिल्यांदाच येत होता घरात. बघून पोशाख त्याचा सैनिकाचा उर आला तिचा भरून , तोही गोड हसला स्यालुट तिला करून .
आता बाहेर निघताना एकटी ती नसायची. नवऱ्यासोबत फिरताना सारखी ती हसायची. एक महिना गेला कसा कळलेच नाही कुणा. परत आता एकटेपण सांगा काय तिचा गुन्हा . घरदार सोडून तो जातो देशासाठी सीमेवर. तरीही लवलेश नसतो दुःखाचा पत्नीच्या त्या मुखावर. पती जेव्हा असतो देशाच्या त्या सीमेवर. पत्नीही लढते इथे एकाकी त्या जगण्यावर . कधी मधी येऊन जातात भाऊ बहीण नातेवाईक. मात्र लढते ति एकटीच होऊन स्वतःही सैनिक दुःख तिचे तिलाच ठाऊक.
डोळे असतात वाटेवर आणि कान टीव्ही वरच्या बातम्यांवर. सीमेवरच्या तणावाची बातमी ऐकून उठतो काटा मनावर . करते मग ती धावा देवाचा, म्हणते सुखरूप ठेव देवा कुंकू हे माझे. येईल जेव्हा दारी तुझ्या , फेडील नवस सारेच तुझे.
यावेळी मात्र दिलं देवानं एक वरदान. गर्भात तिच्या वाढू लागला अंकुर एक छान. बातमी आनंदाची पतीला तिने दिली. सीमेवरच होता तो सहजच म्हणाला , मुलगी आपणास झाली तर नाव ठेऊ या मिली. दोघनच्याही मनात नव्हता आनंद मावत. वाटतायचं त्याला कधी आत्ताच उठून जावे घरी धावत.
दिवसामागून दिवस गेले. लेकीचे पाय घरात आले. कौतुक बघाया नव्हते कोणी. बाप तिचा सीमेवर लेक मात्र गुणी. मधेच बाप येऊन गेला. लेकीचे लाड करून गेला. नव्हते वाटत जावे परत. मात्र सुट्ट्या सम्पताच मनावर दगड ठेऊन गेला तो परत. वर्षातून दोनदा यायचा तो घरी. लाड कौतुक करायचा खूप, बघून आपली परी.
आई सारखीच सुंदर दिसायची त्याची ती मिली.बोबडे बोल बोलायची , जय भारत म्हणून स्यालुट जोरात करायची. बाबांचा तिच्या तिला होता अभिमान. देशाबद्दल मनात तिच्या भारीच सन्मान. हळूहळू मोठी होत होती लेक. मोठे झाल्यावर बाबांसारखेच सैन्य दलात जायचे स्वप्न तिचे एक.
दिवसामागून दिवस वर्षामगून वर्ष जात होते असेच. दृढ होत होता निश्चय ,आयुष्य आपले देशासाठीच द्यायचे. आणि सीमेवरून एक दिवस खबर आली बाबा शहीद झाले. शेवटचा स्यालुट करत अश्रूपूर्ण नेत्रांनी स्वप्नपूर्तीचे आश्वासन बाबांना तिने दिले. Sanjay R.
मी……. मी मी ची गर्दी इथे हरवलो त्यात मी । सांगतंय कोणी तू तोच का आहे मी । मि ला मी शोधतोय आहे कुठे तो मी । बघतो अंतरात जेव्हा मी तर आहे तोच मी ।
तू…… तू ला मी शोधू कुठे तू इथे की तू तिथे । आहेस तू , तू जिथे शोधले मी तुला तिथे । तू मनात तू ध्यानात तू क्षणात तू कणात । तू तुझ्यात तू माझ्यात आहे माझ्या तू हृदयात । Sanjay R.
बाप घराचा आधार उचले सारा भार । करून कष्ट अपार करी उभा संसार । झेलतो सारे वार मानतो कुठे हार । अव्यक्त ते विचार तीक्ष्ण लागे धार । वाटे करतो प्रहार अंतरात बंद सार । Sanjay R.
थंडी सुरू झाली कशी यात सांग कुणाचा गुन्हा । आठवण आली तुझी नि काहूर उठलं पुन्हा । आहेस कुठे तू सांगना माझा मीच झालो सुना । बघतो दूर तिथे शुन्यात घाव आहे कुठे तो जुना । Sanjay R.
प्रवास हा जीवनाचा देऊ कसे सोडून सारे । जीव छोटासा मुंगीचा हट्ट किती जगण्याचा । कण कण गोळा करी विचार कुठे मरणाचा । जीवन हे अनमोल किती शोधू क्षण आनंदाचा । सारून दूर दुःख सारे करू प्रयास हसण्याचा । बघ जरा तू दूर गगनात ताप किती त्या सूर्याचा । दूर सरतो अंधार सारा शीतल प्रकाश चंद्राचा । उठ मानवा जागा हो सोड विचार जाण्याचा । Sanjay R.
ती रात्र अंधाळलेली गेली कशी मज कळलेच नाही । धुंद होती ती हवा, मदहोश होते मन कळलेच नाही । रात्रीस बहरली रातराणी दरवळलेला गन्ध कळलाच नाही । दोन भावनांचा मेळ प्रणयाचा तो खेळ कळलाच नाही । सर्वस्व झाले एकरूप बंधन कशाचे आता उरलेच नाही । तू फक्त आणि मी सत्य जीवनाचे कळले सारे काही । Sanjay R.
आठवण आली तुझी की सुचतात मला शब्द । नसतीस तू सोबतीला तर बसलो असतो ना स्तब्ध । प्रयत्न तर खूप करतो माहीत नाही कसे हे प्रारब्ध । हवी तुझी साथ मला तुझ्यातच व्हायचं मला मुग्ध । Sanjay R.
असतो रोज एक पेपर जीवनाची हीच परीक्षा । सामोरे जायचे रोजच गुणांची नसते अपेक्षा । सुख म्हणतात ते आहे कुठे भोग भोगायचे हीच दीक्षा । जगण्यासाठी चाले सारे घ्यायचे श्रम हीच शिक्षा । घेतो वेचून थोडा आनंद उंच उडायचे ही अपेक्षा । Sanjay R.
पार्वता वय वर्षे असावे तीस बत्तीस. उंचीही मध्यम बांध्याची . अंग काठी तिच्या उंचीला साजेशी. रंग काळा सावळा . केस तेल न मिळाल्याने थोडे पिंगट सोनेरी झालेले. नाक थोडे लांब आणि डोळे अगदी कोरीव वाटावे असे . गालावर नेहमीच हास्य असणारी. तिला सुंदर अस म्हणता येणार नाही पण तिचा चेहराच असा की कुणालाही आकर्षित करेल असा. तिचा नवरा म्हादू मात्र अगदीच वेगळा. वाटेल यान मागची आंघोळ कधी केली असेल , महिना तर नक्कीच झाला असेल . वयाचा अंदाजच येणार नाही असा. कृश झालेले शरीर. डोक्यावर केस वाढलेले. दाढी मिशी आडवी तिडवी वाढलेली आणि त्यातच त्याचा चेहरा लपलेला. अंगावर फटके कपडे म्हणजे काय तर फटका पायजामा आणि फाटका सदरा. हात नेहमीच काळ्या वंगणाने भरलेले. त्याचा हा नेहमीचाच असा अवतार असायचा. पण कोणीही आवाज दिला की तो पुढ्यात हजर असायचा. सांगेल ते काम करायचा . आणि दिले तेवढे पैसे घ्यायचा. दुपारी पर्वता त्याची शिदोरी घेऊन यायची आणि म्हादू जेवण करून संध्याकाळ पर्यंत ते काम करायचा. मात्र सायंकाळी काम आटोपतच त्याला नकदी पैसे लागायचे. सायंकाळी मिळालेले सगळे पैसे तो दारूत घालवायचा. पैसे मिळाले की सरळ पार्ध्यांच्या बेड्यावर जाऊन खिशात असेल तेवढे पैसे पार्ध्यापुढे टाकायचा आणि वाटेल तेवढी दारू प्यायचा . आणि मग झिंग आली की बेड्यावरच कुठेतरी पडून रहायचा. आणि मग रात्री केव्हा तरी पर्वता त्याला शोधत बेड्यावर यायची आणि त्याला उठवून घेऊन जायची. तो तसाच मग जेवण न करताच झोपून जायचा. हा असा क्रम अगदी नेहमीचाच झाला होता. घराचा सगळाच भार पर्वतावरच होता. लग्नाला दहा बारा वर्षे होऊनही घरात पाळणा हलला नव्हता. त्यामुळे घरात दोघे होते. म्हदूचे आई वडील त्याच्या लहान पणीच साथीच्या रोगात गेले होते. पर्वताला तिची आई वडील भाऊ होते पण ते लांब दुसऱ्या गावात असल्यामुळे त्यांचे पण पर्वताशी जास्त सम्बन्ध येत नव्हता. त्यांनी तिचे लग्न करून देऊन आपले कर्त्यव्य पूर्ण केले होते. आणि ते पर्वताच्या बाबतीत बिनधास्त झाले होते. पर्वतानेही कधी आपल्या संसाराची वाच्यता आपल्या आई वडिलांकडे कधी केली नाही. कारण तिला माहिती होते की तिलाच आपला संसार चालवायचा आहे. आई वडीलही गरिबीतच जगत आहेत त्याना सांगून काहीच उपयोग होणार नव्हता. उलट त्यांनी तिलाच दोष दिला असता की तिला तिचा नवरा व्यवस्थित सांभाळता आला नाही. माणूस सांभाळणं बाईच्याच हाती असते. भल्या बुऱ्याचा विचार दोघांनी मिळून करायचा असतो. त्यामुळे पर्वता आपल्या नशिबात असेच असेल म्हणून सारेच सहन करत होती. नेहमीप्रमाणे आजही पर्वता सकाळी उठली. घरातले काम धाम ही सम्पले तरी म्हादू उठला नव्हता. तिने थोडे दुर्लक्ष करून स्वैपाकाची तयारी केली. तिचा स्वैपाक आटोपला तरीही म्हादू उठला नव्हता. म्हणून ती म्हादू जवळ गेली. आज का कामाले जाच न्हाय का म्हणत तिने म्हादू च पांघरून काढलं तर म्हादू तसाच पडून होता. तिने त्याचा अंगाला हात लावला तर त्याचे अंग भयंकर तापत होते. तिने त्याला कडावर लोटले तरी तो काहीच हालचाल करत नव्हता. तिला मग मात्र घाबरल्या सारखे झाले. म्हादुचा स्वास मात्र चालू होता. तो मूर्च्छित झाला होता. ती तशीच घराबाहेर आली कुणाला तरी मदतीला बोलवावे म्हणून तिने आजूबाजूला कोणी दिसतो का ते बघितले दूर तिला म्हातारे तानाजी दिसले. तिने त्यांना आवाज दिला आणि घरात बोलवले. तानाजीने म्हादू ला बघितले तर तेही थोडे घाबरलेच. त्यांनाही काही कळले नाही की म्हादुला काय झाले असेल ते. मग त्यानीच सुचवले याले डॉगतर कड न्या लागते बाई, पाय तू कस करते तं पर डॉगतर शिवाय काई होणार न्हाई. लवकर न्या लागते . आणि तानाजी निघून गेला. तशी पर्वता विचार करतच बाहेर आली आता याले कसं न्यावं डॉगतर कड, डॉगतर त पाच कोस दूर रायते. गाडी घोडा पहा लागते पर त्याला बी पैसे लागन आन डॉगतरलेबी पसे द्या लागन मंग औशिध बी लागन त्याले बी पैसे पायजे. माया जोळ पाचशे हायेत तेच्यात होईन का सगळं. असा विचार करत करत ती रस्त्यावर आली. नशिबाने तिथे तिला पाटील भेटले. तेच बोलले काओ पर्वता आज कामाले न्हाई जाच का. म्हादू कुनकड गेला कामाले. मग तिने पाटलाला सगळं सांगितलं. तसं पाटलाने आटो वाल्याला आवाज दिला. अरे बाबू पाय बर म्हादू बिमार हाये त्याले घेऊन जाय डोकटर पाशी. भर सवाऱ्या लोकर लोकर न निंग पटकन्या. तसं आटोवाल्याने पटापट सवाऱ्या भरल्या आणि आटो म्हादू च्या घरापुढे आणला. लोकांनीच म्हादू ला धरून आटोत टाकला सोबत पर्वताही बसली. आणि ते डॉक्टर कडे पोचले. डॉक्टर ला पेशन्ट चा अंदाज आला त्यांनी पटापट दोन इंजेक्शन लावले आणि औषधींचा कागद लिहून म्हणाले. मी हे औषध देतो पण याचे लिव्हर खराब होत आहे. दारू पूर्ण बंद करा लागेल नाहीतर काहीच खरे नाही. इंजेक्शन मूळे म्हादू ला होश आला होता. तो पर्वता कडेच टुकुर टुकुर बघत होता. तशी पर्वता त्याला म्हणाली पेत जाना दारू आन मंग मर असाच. तुले काय हाये. महाच नशीब फुटक. तुह्या पदरी पडली. कोणतं सुख देल तुन मले. आता तं मराले टेकला. तुह्या दारू पाई सगळा सत्यानाश झाला. चार पैसे बी न्हाई ठिवले तुन पदराले बांधून . आणि ती रडायला लागली. तिचे रडणे आज म्हादू च्या काळजात पोचत होते. पण त्याच्याच्याने काहीच बोलणे होत नव्हते. तो तसाच शांत पडून पर्वता कडे बघत होता.